इचलकरंजी शहराला कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेतून सुरळीत व मुबलक पाणी (Water Supply) पुरवठा होण्यासाठी ८०० मी. मी. व्यासाची दाबनलिका पंचगंगा नदीपात्रातून टाकण्याच्या कामाचे त्वरित अंदाजपत्रक तयार करून काम पूर्ण करण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता जे. डी. काटकर यांना सूचना केल्या.
इचलकरंजी शहरास पंचगंगा आणि कृष्णा नदीतून मजरेवाडी येथील कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. कृष्णा योजनेच्या पाईपलाईनला वारंवार होणाऱ्या गळतीमुळे शहरामध्ये पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावत आहे. या संदर्भात दैनिक महासत्ताने लेखमालिका प्रसिध्द करून जनजागृती केली होती.
याची दखल घेत खास धैर्यशील माने यांनी, सध्या उन्हाळा सुरू झाल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे हाल होत असल्याने कृष्णनळपाणी योजनेच्या पंचगंगा नदीवरील गळती काढण्यासाठी पूर्वीच्या अंदाजपत्रकामध्ये स्ट्रक्चरल ब्रिज द्वारे दाब नलिका टाकण्याच्या कामास मंजुरी मिळाली होती.
त्यामध्ये बदल करून नदीपात्रातून पाईपलाईन टाकण्यास पाटबंधारे विभाग कोल्हापूर उत्तर यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. नवीन मंजुरीनुसार या कामाचे अंदाजपत्रक त्वरित तयार करून संबंधित ठेकेदाराकडून तात्काळ ही पाईप बसवून इचलकरंजीचा पाणीपुरवठा सुरळीत करावा असे पत्राद्वारे मागणी केली आहे.
खासदार धैर्यशील माने यांनी दिल्लीमधून दूरध्वनीवरून महाराष्ट्रजीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री. काटकर यांच्याशी चर्चा करून त्वरित काम पूर्ण करण्याबरोबरच उर्वरित पाच किलोमीटरचा डीपीआर करण्याच्या सूचनाही खास माने यांनी सूचना केल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांनी मुख्य अभियंता यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत इस्टिमेट तयार करून त्यास मंजूरी आणून त्वरित हे काम पूर्ण करून घेणार असल्याचे खासदार माने यांना सांगितले.
त्यामुळे सध्या इचलकरंजी शहरामध्ये भेडसावत असलेली पाणीटंचाई लवकरच दूर होऊन सुरळीत पाणीपुरवठा (Water Supply) होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, इचलकरंजी शहरा पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचेही खास, धैर्यशील माने यांनी सांगितले.