गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणाविरोधात बंद असलेली कारवाई आज मंगळवारपासून महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन (Elimination of encroachment) पथकाने पुन्हा धडक कारवाई सुरू केली. यामध्ये बंद असलेले पाच हातगाडे जप्त केले. तर मुख्य रस्त्यावरील भाजीपाला, फळविक्रेत्यांना आतील रस्त्यावर त्यांना जागा देण्यात आली.
त्यामुळे आज पुन्हा मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला.शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न नेहमीच चर्चेचा विषय बनलेला असतो. अनेक छोटे-मोठे व्यावसायिक रस्त्यावरच ठाण मांडून व्यवसाय करीत असतात. त्यांच्या विरोधात कारवाई केली जाते. मात्र, पुन्हा छोटे व्यापारी रस्त्यावर येऊन व्यवसाय करत असतात.
नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी वाढत्या अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्याच्या सुचना महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाला दिल्या होत्या. त्यानंतर सदर पथकाने शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावरील तसेच मुख्य चौकातील अतिक्रमण काढले होते. त्यामुळे समाधानाचे वातावरण होते.
मात्र गणेशोत्सवाच्या काळात अतिक्रमणाविरोधातील कारवाई तात्पुरती थांबवली होती. त्यामुळे पुन्हा शहरात अतिक्रमण वाढले होते. मात्र महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन (Elimination of encroachment) पथकाने आज मंगळवार ता.१३ पासून अतिक्रमण विरोधात कारवाई सुरू केली. शहरातील गांधी पुतळा ते के. एल. मलाबादे चौक मुख्य रस्त्यावरील भाजी विक्रेते, फळ विक्रे ते हटवण्यात आले.
त्याचबरोबर राणीबाग, शाहू पुतळा, जुनी महानगरपालिका इमारत, स्टेशन रोड आदि भागातील पाच बंद हातगाडे जप्त केले. सदरची कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख सुभाष आवळे यांच्यासह कैलास आवळे, प्रदिप शेवाळे, पिंटू कांबळे, प्रकाश हेगडे, सचिन कांबळे आदिंच्या पथकाने केली.
इचलकरंजीतील वाढत्या अतिक्रमणाबाबत दैनिक महासत्ताने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महानगरपालिका अतिक्रमण निर्मुलन पथकाने याची दखल घेऊन अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू केली. सदरची कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती अतिक्रमण निर्मुलन(Elimination of encroachment) विभागाचे प्रमुख सुभाष आवळे यांनी दिली.