अवघ्या क्रिकेट रसिकांना सध्या वेध लागले आहेत ते T-20 वर्ल्ड कपचे. 16 ऑक्टोबरला म्हणजे येत्या रविवारपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. त्यासाठी रोहित शर्माची टीम इंडिया ऑस्ट्रेलियात पोहोचली आहे. वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्यासाठी सगळ्याच संघांचा कसून सराव करत आहेत.
त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी टीमला नामोहरम करण्यासाठी रणनीती आखत आहेत. टीम इंडियानेदेखील टी-20 वर्ल्ड कपसाठी जोरदार सराव सुरू केला आहे. त्याचप्रमाणे टीम इंडिया एक खास रणनीती आखत आहे. वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाने याची झलक कालच्या सराव सामन्यात दिसली.
T-20 वर्ल्ड कप 2022 सुरु होण्यास आता केवळ एक आठवड्याचा कालावधी बाकी आहे. टीम इंडिया सध्या जोरदार तयारी करत आहे. त्यातच टीम इंडियाने सोमवारी पश्चिम ऑस्ट्रेलिया टीमविरुद्ध पहिली अनऑफिशियल वॉर्मअप मॅच खेळली.
या मॅचमध्ये टीम इंडिया 13 रन्सने विजयी झाली. ऑस्ट्रेलियात पोहोचताच आपल्या रणनीतिचा एक भाग म्हणून टीम इंडियाने मोठा डाव आखला आहे. त्याची झलक या वॉर्मअप मॅचमध्ये दिसून आली. अर्थात हा डाव ओपनिंग बॅट्समन संदर्भात आहे.टीम इंडियाचा माजी कॅप्टन एम.एस. धोनीने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी असाच एक खास डाव खेळला होता.
त्यावेळी धोनीने रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची जोडी ओपनिंगसाठी तयार केली. ही जोडी खास चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयार केली गेली होती. या डावपेचामुळे क्रिकेट जगतातून आश्चर्य व्यक्त केलं गेलं होतं. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये या दोघांनी भरपूर रन्स काढले आणि अखेरीस टीम इंडियाने या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. यामुळे रोहित शर्माचं करिअर पूर्णपणे बदलून गेलं.
टीम इंडियाने आपल्या पहिल्या वॉर्मअप मॅचमध्ये एक नवी जोडी ओपनिंगसाठी ग्राउंडवर उतरवली होती. कॅप्टन रोहित शर्मासह विकेटकीपर आणि बॅट्समन ऋषभ पंत बॅटिंगसाठी ग्राउंडवर उतरला. परंतु, या मॅचमध्ये हे दोघं फारसे रन काढू शकले नाहीत. रोहित 3 तर पंत 9 रनांवर आउट झाला; पण विरोधकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरू शकेल असा हा फॉर्म्युला टीम इंडियाच्या रणनीतिचा एक भाग असू शकतो.
दिनेश कार्तिकचा टीममध्ये समावेश झाल्यापासून पंतची प्लेईंग -11 मधील जागा संकटात आली आहे. पंतला टी-20 फॉरमॅटमध्ये ओपनिंगला पाठवावं, तो नक्कीच यशस्वी होऊ शकतो आणि विरुद्ध टीमला आश्चर्याचा धक्का देऊ शकतो, असा सल्ला अनेक क्रिकेटतज्ज्ञांनी दिला होता.
पहिल्या वॉर्मअप मॅचसाठी के. एल. राहुल आणि विराट कोहली यांचा प्लेईंग 11 मध्ये समावेश नव्हता. या दोन्ही क्रिकेटर्सना विश्रांती देण्यासाठी वगळण्यात आलं होतं. त्यामुळे टीम इंडियासाठी पंत ओपनिंगला आला. दुसऱ्या वॉर्मअप मॅचसाठी राहुलचा टीममध्ये समावेश झाला तर टीम इंडियाची रणनीति अगदी स्पष्ट होईल.
T-20 राहुल टीमसाठी ओपनिंग करेल. गरज पडल्यास विराट कोहलीला ओपनिंगसाठी पाठवण्यात येईल, असं टी -20 वर्ल्ड कपपूर्वी कॅप्टन रोहित शर्मानं सांगितलं होतं. गेल्या काही काळापासून T-20 मॅचेससाठी टीम इंडियाकडून राहुल आणि रोहित ओपनिंग करत आहेत. मात्र, राहुलचा स्ट्राईक रेट मंदावला आहे. त्यामुळे त्याच्या स्थानाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.