रविवारी गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली. गुजरातच्या राजकोटमधील मोरबी भागात पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. यादरम्यान पुलावर उभे असलेले शेकडो लोक मच्छू नदीत पडले. मिळालेल्या माहितीनुसार, मोरबी दुर्घटनेत आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू (death) झाला आहे. यात महिला, लहान मुलं आणि वृद्धांचाही समावेश आहे. या अपघातात 177 जणांना वाचवण्यात यश आलं असून 19 जखमींवर मोरबी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
गुजरातच्या माहिती विभागाने ही माहिती दिली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी मोरबीमध्ये उपस्थित आहेत. गुजरात निवडणुकीच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमधील आपला रोड शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे वाचा : बँक खात्यातून क्षणात गायब होतील पैसे; आताच Delete करा ‘हे’ Apps
एनडीआरएफ, एसडीआरएफ, आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही व्यतिरिक्त, स्थानिक प्रशासन मोठ्या प्रमाणावर बचाव आणि मदत कार्यात गुंतलं आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दुरुस्ती आणि नूतनीकरणानंतर हा हेरिटेज पूल 4 दिवसांपूर्वीच लोकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता. मात्र रविवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली.
गुजरात सरकारने (government) मोरबी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. मच्छू नदीत पडलेल्या लोकांना वाचवण्यासाठी पथके कार्यरत आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.मोरबीच्या केबल ब्रिजवर जाण्यासाठी पर्यटकांना 17 रुपये आणि लहान मुलांचे तिकीट 12 रुपये होते.
पुलाच्या दुरुस्तीनंतर सर्व काही सुरळीत सुरू होते. त्यामुळेच रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे आले होते. प्रश्न असा आहे की, पुलाची क्षमता जास्त नसेल, तर मग इतक्या लोकांना तिकीट देऊन झुलत्या पुलावर जाण्याची परवानगी का देण्यात आली? या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.