मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्र आणि नजीकच्या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी (Cold Wave) पडल्याचं पाहायला मिळालं. आता मात्र ही थंडी काहीशी ओसरली आहे. हवामानातील या बदलाचे थेट परिणाम नागरिकांच्या प्रकृतीवर होताना दिसत आहेत. पण, असं नेमकं का, हे तुमच्या लक्षात आलं? मान्सूननं जसं यंदाच्या वर्षी नवनवे विक्रमच प्रस्थापित केले तसंच हा हिवाळ्याचा ऋतूही नोव्हेंबरमध्येच विविध रंग दाखवू लागला आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमान कमी होऊ लागलं.दिल्लीमध्येतापमान 7.9 अंशांवर असतानाच काश्मीरमध्ये पारा शुन्याच्याही खाली उतरला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री उशीरा श्रीनगरमध्येही तापमान 2.1 अंशांवर पोहोचवं होतं. यंदाच्या मोसमातील हे सर्वाधिक कमी तापमान ठरत आहे.
तर, तिथे अमरनाथ वाटेवर असणाऱ्या पहलगाम येथे तापमान उणे 3.4 अंश असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारपासूनच महाराष्ट्रात ढगाळ वातावरण (Cold Wave) पाहायला मिळालं. यामध्ये उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा प्रभाव कमी पडला आणि महाराष्ट्रातील गारवा काहीसा ओसरला. दुपारच्या वेळी सूर्याचा प्रकोप एकाएकी वाढल्यामुळं पुन्हा जीवाची काहिली झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, येते काही दिवस तापमानामध्ये हे अनपेक्षित बदल दिसतील अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. वातावरणात झालेले हे सर्व बदल पाहता येणाऱ्या दिवसांमध्ये दक्षिणेकडील राज्यांत पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ, पुदुच्चेरी, अंदमान आणि निकोबार बेट समूह यांसह इतरही भागांमध्ये सोमवार आणि मंगळवारी पावसाच्या सरी बरसू शकतात.
उत्तर अंदमान समुद्रामध्ये चक्रीवादळसदृश वारे वाहत असल्यामुळं हवमानात हा बदल झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामानामध्ये होणारे हे सर्व बदल पाहता नागरिकांच्या आरोग्यावर याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. सध्याच्या घडीला एकिकडे जगभरात कोरोना पुन्हा डोकं वर काढतानाची चित्र पाहायला मिळत आहेत. त्यातच भारतात हवामानातील बदलांमुळे (Cold Wave) सर्दी- खोकला आणि तापामुळं अनेकांनीच प्रकृती अस्वास्थ्याची तक्रार केली आहे. त्यामुळं या बदलांदरम्यान तब्येत जपण्यालाही प्राधान्य द्या.