मागील आठवड्यामध्येच भारतासह महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान (Weather) विभागानं दिला होता. सोमवारपासून राज्यात थंडीचा कडाका वाढणार असा इशारा दिल्यानंतर त्यामागोमागच पुन्हा एकदा हवामान खात्यानं नागरिकांना सतर्क केलं. पुढील 48 तासांत मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला. सध्या महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे तापमान 5.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान असून, येत्या काळात ते आणखी कमीही होऊ शकतं.
हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट केलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्रीच्या सुमारास पुण्यात तापमान 10.8 अंशांवर पोहचलं होतं. थोडक्यात इथं थंडीचा कडाका चांगलाच वाढला. इथे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढत असतानाच तिथे देशभरातही हिवाळा चांगलाच रंगात आल्याचं पाहायला मिळत आहे.
नव्या वर्षाची सुरुवात हुडहूडीनंच झालेली असताना देशाच्या उत्तरेकडे थंडी कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. दिल्ली एनसीआर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार इथं रक्त गोठवणारी थंडी पडलीये, तर याचे थेट परिणाम देशातील उर्वरित भागांमध्येसुद्धा दिसून येत आहेत.हवामान (Weather) खात्याच्या माहितीनुसार देशात पश्चिमेकडून येणारे वारे पाहता थंडी तर वाढणारच आहे. शिवाय काही भागांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टी होणार आहे . याचे परिणामस्वरुप तापमानामध्ये लक्षणीय चढऊतार पाहायला मिळतील.
पश्चिमी वाऱ्यांमध्ये झालेला बदल पाहता दिल्ली, एनसीआर, पंजाब, या भागांमध्ये हल्या स्वरुपातील पाऊसधारा पाहायला मिळतील. तर, हिमाचल प्रदेशातील स्पितीच्या खोऱ्यातही पावसाचा शिडकावा होऊ शकतो. इथं पावसामुळं हवेतील गारवाही वाढू शकतो. त्यामुळं पर्यटनासाठी आलेल्या फिरस्त्यांनी विशेष काळजी घ्यावी.
जम्मू काश्मीरमध्येसुद्धा परिस्थिती अशीच असेल, त्यामुळं या थंडीच्या मोसमात नागरिकांनी आरोग्याचीही काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकड़ून करण्यात येत आहे. हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड , हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या दिशेनं जाणाऱ्य़ा मार्गांवरील वाहतुक सध्या धीम्या गतीनं सुरु आहे. हवेत असणाऱ्या धुक्यामुळं वाहतुकीवर गंभीर परिणाम झाले आहेत.
त्यातच हिवाळ्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून देशाच्या उत्तरेकडे अनेक पर्यटक वळले आहेत. दिल्लीहून रस्ते मार्गानं अपेक्षित ठिकाणी पोहोचू पाहणाऱ्यांचा आकडा मोठा आहे त्यामुळं नागरिकांना काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. विमानसेवांवरही या हवामानाचे (Weather) परिणाम झाले असून, काही उड्डाणांचे मार्गही वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.