कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विषयाचे तरुण प्राध्यापक डॉ. शैलेश वाघमारे यांनी विद्यापीठाजवळील राजाराम तलावात उडी मारून आत्महत्या (Crime ) केली आहे. या घटनेमुळं कोल्हापूरच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या नसून सरकारनं केलेला खून आहे, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षानं केला आहे.
डॉ. शैलेश वाघमारे हे गेली बारा वर्षे कंत्राटी पद्धतीनं पदव्युत्तर विभागात प्राध्यापक म्हणून काम करत होते. मात्र, त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगानं ठरवून दिलेलं वेतन दिलं जात नव्हतं. दरवर्षी त्यांना ब्रेक देऊन पुन्हा कंत्राटी पद्धतीनं सेवेत घेतलं जाई. ते करतानाही महिनो न् महिने पुन्हा नव्यानं नेमणूक करण्यास अक्षम्य विलंब केला जाई.
कंत्राटी कर्मचारी म्हणून घेतल्यामुळं मिळणारं वेतनही तुटपुंजं असे. यामुळं आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. मुंबई आयआयटीमधील दर्शन सोळंकी या दलित विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर आता प्राध्यापकानं आत्महत्या केल्यामुळं शिक्षण क्षेत्रात चिंता व्यक्त होत आहे.
हे वाचा : गौतमच्या कार्यक्रमात तुफान राडा , पोलिसांचा लाठीचार्ज, नागरिकांची पळापळ…
ही आत्महत्या (Crime) नसून सरकारकृत धोरणांनी केलेली हत्याच आहे, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षानं केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार होणाऱ्या वेतनाची शैलेश वाघमारे यांची बारा वर्षांची थकबाकी राज्य सरकारनं त्यांच्या कुटुंबीयांना त्वरित दिली पाहिजे, अशी मागणी भाकपनं केली आहे.
शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठातील शिक्षक आणि कर्मचारी भरतीची कंत्राटी पद्धत शैक्षणिक गुणवत्तेचा गळा घोटत आहे. रिक्त जागा न भरल्यानं उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंध:कारमय झालं आहे.अशा परिस्थितीत तात्पुरते आणि कंत्राटावरील शिक्षक, कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनानं त्वरित नियमित आणि कायमस्वरूपी नेमणूक दिली पाहिजे.
सर्व सरकारी आणि निमसरकारी व्यवस्थापनातील कंत्राटी पद्धत रद्द केली पाहिजे. सर्व रिक्त जागा त्वरित भरल्या पाहिजेत. नेमणुकांतील ओंगळ भ्रष्टाचार संपवला पाहिजे. यासाठी शिक्षणक्षेत्रातील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी आदी सर्व घटकांनी एकजुटीने लढ्यात उतरले पाहिजे, असं आवाहनही भाकपनं केलं आहे.