राजस्थान रॉयल्सने आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर 29 धावांनी विजय मिळवला. राजस्थानने आजचा सामना (IPL) जिंकून या सीजनमधील मागच्या पराभवाचा हिशोब चुकता केला. राजस्थानची फलंदाजी आज अपेक्षेनुसार झाली नाही. 20 षटकात त्यांना फक्त 144 धावाच करता आल्या. रियान परागमुळे राजस्थानला लढण्याइतपत धावसंख्या उभारता आली.
RCB ला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले होते. T-20 क्रिकेटच्या दृष्टीने ही फार मोठी धावसंख्या नाहीय. पण राजस्थानच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करुन आरसीबीला विजयपासून वंचित ठेवलं. राजस्थानच्या 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB चा डाव 115 धावात आटोपला. RCB चा संघ रथी-महारथी स्टार खेळाडूंनी भरलेला आहे. वास्तविक त्यांच्यासाठी हे खूप सोपं लक्ष्य होतं. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
काय आहेत आरसीबीच्या पराभवाची कारणं
– विराट कोहलीचं अपयश हे RCB च्या पराभवाचं मुख्य कारण आहे. तो सातत्याने अपयशी ठरतोय. धावा त्याच्या बॅटमधून निघतच नाहीयत. विराट नेहमी वनडाऊन येतो. पण तो आज सलामीला आहे. पण त्याने काहीच बदललं नाही. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर अवघ्या 9 रन्सवर त्याने रियान परागकडे झेल दिला. RCB च्या विजयासाठी (IPL) विराटची बॅट चालणं खूप आवश्यक आहे.
– डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल सारखे फलंदाज पाठोपाठच्या चेंडूवर बाद झाले. इतके मोठे मॅचविनर्स लागोपाठ बाद झाले, तर संघावर दबाव येणं स्वभाविक आहे. सुरुवातीला मोठी भागीदारी होणं आवश्यक आहे. पण इथे 40 धावात आरसीबीचे तीन फलंदाज तंबूत परतले होते.
– सुयश प्रभूदेसाईला अनेक संधी मिळूनही छाप उमटवता येत नाहीय. तो आज दोन रन्सवर आऊट झाला. फटकेबाजी करण्याच्या नादात त्याने अश्विनच्या गोलंदाजीवर रियान परागकडे झेल दिला. त्याने खेळपट्टीवर थोडं थांबून सेट व्हायला पाहिजे होतं. संघाला गरज असताना अशी विकेट फेकणं चुकीचं आहे.
– दिनेश कार्तिक आज रनआऊट झाला. ते सुद्धा आरसीबीच्या पराभवाचं एक कारण आहे. खरंतर दिनेश कार्तिक चांगल्या फॉर्ममध्ये (IPL) आहे. तो एकहाती सामना फिरवू शकतो. पण निर्णायकक्षणी त्याच्यासारख्या फलंदाजाचं रनआऊट होण कुठल्याही संघाला परवडणारं नाही.
राजस्थानच्या विजयाची प्रमुख कारणं
– रियान पराग राजस्थानच्या विजयाचं पहिलं कारण आहे. कारण त्याने कठिण परिस्थितीत 31 चेंडूत 56 धावांची खेळी केली नसती, तर राजस्थानला 144 या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचता आलं नसतं. टीम अडचणीत असताना त्याने राजस्थानचा डाव सावरला.
– कुलदीप सेन आणि रविचंद्रन अश्विन यांनी आज जबरदस्त गोलंदाजी केली. कुलदीपने 3.3 षटकात 20 धावा देत चार विकेट काढल्या. फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल सारख्या अव्वल दर्जाच्या आंतरराष्ट्रीय फलंदाजांना त्याने पाठोपाठच्या चेंडूवर बाद केले. त्यामुळे आरसीबीचा (IPL) संघ बॅकफूटवर ढकलला गेला.
– रविचंद्रन अश्विनने आज चार षटकात 17 धावा देत तीन विकेट काढल्या. रजत पाटीदार, शाहबाद अहमद आणि सुयश प्रभूदेसाई या महत्त्वाच्या फलंदाजांना त्याने पॅव्हेलियनमध्ये धाडलं. प्रसिद्ध कृष्णाने दोन विकेट काढून चांगली साथ दिली. आज फलंदाजी फ्लॉप ठरली, तर गोलंदाजांनी जबाबदारी ओळखून संघाला विजय मिळवून दिला.