दिवसेंदिवस कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाण्याची (water crisis) कमी होत चाललेली पातळी, पावसाने दिलेली ओढ यामुळे इचलकरंजी शहरवासियांपुढे पाण्याचे मोठे संकट उभा राहिले आहे. शहरवासियांना एक दिवसाआड मिळणारे पाणी आता चार-पाच दिवसाने येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनापुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. जोपर्यंत पावसाला सुरुवात होत नाही तोपर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार नसल्याचे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
इचलकरंजी शहराला कृष्णा व पंचगंगा नदीतून पाणी उपसा करुन पाणी पुरवठा केला जातो. मजरेवाडी येथील कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या वितरण नलिकेला वारंवार गळती आणि पंचगंगेच्या प्रदूषणामुळे पाणी उपसा (water crisis) कमी होतो. त्याचा विपरीत परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होतो. त्यामुळे कृष्णेचे वितरण नलिका बदलण्याचे काम हाती घेतले आहे.
सध्या साडेपाच कि.मी. अंतराचे पाईपलाईन बदलण्याची बाकी राहिली आहे. याबाबत पालिकेने प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून त्याला लवकरच मंजूरी मिळेल अशी आशा आहे. तर पंचगंगा नदीतील कट्टीमोळा डोहातून अतिरिक्त पाणी उचलण्यास सुरुवात केली. त्यामुळे कृष्णा नळपाणी | पुरवठा योजना, पंचगंगा नदी व कट्टीमोळा डोहातून पाणी उपसा करुन शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करण्यास पालिका प्रशासन यशस्वी झाले होते. त्यामध्ये काहीवेळा कृष्णा गळतीचे ग्रहण लागत असल्याने पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडत होते.
मान्सूनचे आगमन होऊन १५ दिवस उलटले तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नसल्याने आणि राधानगरी, काळम्मावाडी, वारणा आदी धरणातील पाणी पातळी कमी होवू लागल्याने पंचगंगा, कृष्णा नदीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटू लागली आहे (water crisis). याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. कृष्णेची पातळी कमी झाल्याने एका पंपाद्वारे पाणी उपसा सुरु आहे तर पंचगंगा व कट्टीमोळातून पाणी उपसा सुरु आहे. मात्र पातळ कमी असल्याने म्हणावा त्याप्रमाणात पाणी उपसा होत नाही.
शहराला दररोज ५४ एमएलडी पाण्याची आवश्यकता असते. मात्र सध्या केवळ १५ ते २० एमएलडी पाणी उपसा करुन पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे एक “दिवस आड मिळणारे पाणी आता ४ ते ५ दिवसाने मिळत आहे, अशीच पावसाने ओढ कायम ठेवली तर इचलकरंजीला पाणी संकटाला मोठे तोंड द्यावे लागेल, अशी भिती व्यक्त केली जात आहे.