मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM) यांनी आपल्या कामकाजाची सूत्र हाती घेतली त्या क्षणापासून अनेकांनीच त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवल्या. शक्य त्या सर्व प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आपल्या कामानं नागरिकांची मनं जिंकली.
त्यातच आता त्यांनी सर्वांसमक्ष नागरिकांना मोठं वचनही दिलं. वाढती लोकसंख्या आणि त्यामुळं उदभवणारी वाहतूक कोंडी या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करत लोकहितासाठी त्यांनी हे वचन दिलं. पिपरी चिंचवड येथे आयोजिक एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री बोलत बोते.
यावेळी पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या संपवण्यासाठी त्यांनी आग्रही सूर आळवत उपस्थितांना आश्वस्त केलं. मुंबईत वाहतूक कोंडी होते, म्हणून तिथं मेट्रोला चालना देण्यात आली आहे. मेट्रो सर्वत्र धावू लागल्यास रस्त्यांवर होणारी वाहनं कमीच होतील, असं ते म्हणाले.
पुण्यातील वाहतूक कोंडी संपवू असं म्हणत त्यांनी विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे आणि पुणेकरांना वचन दिलं. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हीच बाब त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. आता मुख्यमंत्री (CM) त्यांचा हा शब्द पाळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, पुण्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या वाढताना दिसत आहे.चांदणी चौक, लक्ष्मी रोड परिसरातही वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. खुद्द मुख्यमंत्र्यांपर्यंत आता या वाहतूक कोंडीच्या समस्येची तक्रार गेल्यामुळं शहरात काही नवे बदल होणार असं म्हणायला हरकत नाही.












