हिवाळ्याचे दिवस सुरु झाले, की अनेकांचेच पाय देशाच्या उत्तरेकडे किंवा अशा ठिकाणांच्या दिशेनं वळतात जिथं गुलाबी थंडीचा (snowfall) आनंद सर्वांनाच घेता येतो. यंदाच्या वर्षी अनेक पर्यटकांनी हिमाचल, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरच्या दिशेनं कूच केलेली असतानाच इथं महाराष्ट्रातील गिरिस्थानांवरही चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे.
सध्याच्या घडीला हिमाचलमध्ये जम्मूपेक्षाही कडाक्याची थंडी पडणार असून, इथल्या पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टी, तर मैदानी क्षेत्रांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुख्य म्हणजे यंदाच्या वर्षी देशाची राजधानी, दिल्ली हिमाचलहून जास्त थंड असल्यामुळं अनेकांच्याच भुवयाही उंचावल्या आहेत.
हिमाचलमध्ये असणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळं (snowfall) अनेक जलस्त्रोत गोठले आहेत. इतकंच नव्हे तर इथं पाईपमधून येणारं पाणीसुद्धा गोठलं आहे. इथं पडलेल्या थंडीचे वाहतुकीवरही परिणाम झाले असून, साधारण 75 मार्ग यामुळं प्रभावित झाले आहेत. लाहौल, कुल्लू, कांगडा, चंबा यांसह इतरही काही जिल्ह्यांमधील मार्गांवर वाहतुक कोंडी पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राचं म्हणाल, तर इथं पारा चांगलाच कमी झाल्यामुळं नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता येत आहे. अनेक ठिकाणी, चौकाचौकांत शेकोट्यांच्या भोवती नागरिक उभे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर, गावठाणांच्या भागात सकाळी उशिरानंच दुकानं उघडली जात आहेत. राज्यात धुळे , जळगाव , नाशिक , सातारा या भागांमध्ये तापमान कमी झालं आहे.
मुंबईतही असंच काहीसं चित्र सध्या पाहायला मिळत असून, 15 अंशांच्या तापमानामुळं मुंबईकरांनाही माथेरानला असते अगदी तशाच प्रकारच्या थंडीचा आनंद घेता येत आहे. उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रातही थंडीनं (snowfall) चांगला जोर धरला असून, पुढल्या काही दिवसांमध्ये हीच परिस्थिती कायम असेल, झोंबणारे हिवाळी वारेही इथं सुटणार आहेत असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
बुलढाणा, गोंदिया, हिंगोली या भागांमध्ये मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळं याचे थेट परिणाम येथील पिकांवर होणार आहेत. इतकंच नव्हे, तर राज्याच्या या भागातील काही ठिकाणांवर पाऊसधाराही कोसळण्याची शक्यता असल्यामुळं आता निसर्गाच्या या रुपाची अनेकांनाची भीती वाटत आहे. पिकांना बहर आलेला असतानाच पावसानं हजेरी लावल्यास होणारं नुकसान मोठं असेल या विचारानंच सध्या बळीराजा हतबल झाला आहे.