राज्यात यावर्षी मुसळधार पाऊस पडला आहे. राज्यातील काही भागात अतिवृष्टी तर मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान याआधी म्हणजे मागील आठवड्यात कोकणसह मुंबईला ऑरेज अलर्ट हवामान खात्याने (weather Update) दिली होता.
त्यानंतर आता कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गासह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे आणि कोल्हापूर, तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि नगर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज उत्तर महाराष्ट्र वगळता संपूर्ण कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. पावसामुळं बोर्डी गावाला नदीचं स्वरुप आलं आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला असून अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. बीडसह माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.
दरम्यान, राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. यंदा महाराष्ट्रात एका जिल्ह्यात तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली. 18 जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पाऊस आहे. 17 जिल्हे सरासरीच्या श्रेणीत असून एकाही जिल्ह्यात पावसाची मोठी तूट नाही.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून (weather Update) वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं सदर जिल्ह्यांतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.