ऋषभ पंतच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाचं वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं स्वप्न भंगलं. भारतीय क्रिकेट (Cricket ) टीमचा टी20 सीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं 7 विकेट्सनं पराभव केला. या पराभवामुळे सलग 13 टी20 इंटरनॅशनल सामने जिंकण्याची भारतीय टीमची संधी हुकली.
आता अफगाणिस्तान, रोमानिया आणि भारत यांनी संयुक्तपणे 12 टी20 इंटरनॅशनल जिंकल्या आहेत. या सामन्यात टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटींग करत 4 आऊट 211 रन केले. हा दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा टी20 मधील सर्वोच्च स्कोअर आहे. आफ्रिकेनं 212 रनचं आव्हान 5 बॉल आणि 7 विकेट्स राखून पूर्ण केलं.
दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने 31 बॉलमध्ये नाबाद 64 रन केले, यात 4 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. रस्सी व्हॅन डर डुसेनने 46 बॉलमध्ये नाबाद 75 रनची खेळी (Cricket ) केली. रस्सीने 7 फोर आणि 5 सिक्स मारले. यावेळी श्रेयस अय्यरनं बाऊंड्री लाईनवर रस्सीचा सोपा कॅच सोडला.
ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे दोघं अनेक वर्ष दिल्ली कॅपिटल्सकडून एकत्र आयपीएलमध्ये खेळले आहेत. पंत कॅप्टन झाल्यानंतर पहिल्याच मॅचमध्ये त्याचा मित्र श्रेयसनं केलेली चूक टीम इंडियाला महाग पडली. श्रेयसनं कॅच सोडला तेव्हा रस्सी 30 बॉलमध्ये 29 रन काढून खेळत होता. त्यानं या जीवदानाचा फायदा घेत पुढील 16 बॉलमध्ये 46 रन करत आफ्रिकेचा विजय निश्चित केला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार (Cricket ) टेम्बा बऊमाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 211 रन केले. इशान किशनने 48 बॉलमध्ये 76 रन केले, त्याच्या या खेळीमध्ये 11 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. याशिवाय श्रेयस अय्यरने 27 बॉलमध्ये 36 आणि कर्णधार ऋषभ पंतने 16 बॉलमध्ये 29 रन केले. हार्दिक पांड्याने 3 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने 258.33च्या स्ट्राईक रेटने 12 बॉलमध्ये नाबाद 31 रनची खेळी केली.