जगभरात आलेल्या मंदीमुळे अनेक कंपन्यांनी आतापर्यंत कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहे. रिपोर्टनुसार, ट्विटर , फेसबुक आणि अॅमेझॉननंतर आता गुगलनेही (google) कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार केला आहे. यामध्ये गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटही आता काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. सध्याच्या अस्थिर अर्थव्यवस्थेने कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करणे भाग पडले आहे.
गुगलची मूळ कंपनी ‘अल्फाबेट’ने सुमारे 10 हजार म्हणजे एकूण मनुष्यबळाच्या सहा टक्के कर्मचाऱ्यांना काढण्याची तयारी केली आहे. मात्र गुगलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी हे प्रमाण केवळ 6 टक्के आहे. दी इन्फॉर्मेशनने दिलेल्या अहवालानुसार, कंपनी एक नवी रँकिंग सिस्टीम वापरून त्यानुसार, कमी गुण मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे.
सध्या, अल्फाबेटमध्ये सुमारे 1,87,000 कर्मचारी काम करत आहेत. तर गुगलमधील (google) एका कर्मचाऱ्याचा सरासरी वार्षिक पगार सुमारे 2.41 कोटी रुपये आहे. गुगलच्या नफ्यात घट झाली असून, कंपनीने तिसऱ्या तिमाहीत 13.9 अब्ज डॉलर निव्वळ नफा नोंदवला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील नफ्यापेक्षा त्यात 27 टक्के घट झाली आहे.
कंपनीच्या एकूण महसुलात फक्त सहा टक्क्यांनी वाढ होऊन 69.1 अब्ज डॉलरवर गेला आहे. कर्मचारी संख्या कमी करण्यामागे ही महत्त्वाची कारणे आहेत.नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही रेटिंग प्रणाली कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापकांना उपलब्ध होईल. यानंतर, व्यवस्थापक त्यानुसार रेटिंग देऊन काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवतील.
यासोबतच व्यवस्थापक त्याला बोनस आणि स्टॉक देण्यासही नकार देऊ शकतो. अनेक दिग्गज आयटी कंपन्यांनी नोकरीवरुन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी रतन टाटा आणि टाटा समूहाने मदतीचा हात पुढे केला आहे.
टाटा समूहाच्या जग्वार लॅंडरोव्हर कंपनीने इलेक्ट्रॉनिक कार निर्मिती आणि डेटा सायन्स क्षेत्रातील कामासाठी काही कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेण्याची तयारी दर्शवली आहे. कंपनीने 800 नोकऱ्यांची माहिती आपल्या संकेतस्थळावर दिला आहे. बार्कलेज पीएलसी या ब्रिटीश बॅंकेने आपल्या नवीन फिनटेक व्यवसायासाटी आयटी कंपन्यांमधून बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याची तयारी दाखवली आहे.












